पुणे येथे जैन मुनीश्री तरुणसागर महाराजांना श्रध्दांजली सभेत आदरांजली अर्पण... तरूण क्रांतीचे एक युग शमले - मुनिश्री पुलकसागर महाराज

पंढरपूर LIVE 1 सप्टेंबर  2018





   ज्या व्यक्तीने बोलणे शिकविले तिच्यासाठी मौन बाळगावे लागत आहे, ज्या व्यक्तीने श्रद्धा ठेवायला शिकविले तिच्यासाठी श्रद्धांजली अर्पण करावी लागत आहे. जिने सर्व शोकांपासून मुक्त केले तिच्यासाठी शोकसभा हा खरोखरच एक कठीण काळ आहे. एक पितृतुल्य व्यक्तीमत्व आज देवत्वाला प्राप्त झाले आहे. ज्या व्यक्तीचे मला घडविण्यात मोलाचे योगदान होते, ती अशी अकाली निघून जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तरूणसागर महाराजांच्या निधनाने तरूण क्रांतीचा एक युग शमला आहे, अशा शब्दांत मुनिश्री प.पु.108 पुलकसागर महाराज यांनी क्रांतीकारी राष्ट्रसंत तरूणसागरजी महाराज यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला. याप्रसंगी अतिदुःखामुळे त्यांनी थांबून-थांबून आपले मनोभावना व्यक्त केल्या. मुनिश्री तरूणसागर महाराजांच्या आठवणीने त्यांना गहीवरून आले होते. तरूणसागर महाराज यांचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे, हीच त्यांच्यासाठी योग्य श्रद्धांजली असेल. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर मी चालतच राहीन, असे ते पुढे म्हणाले.

                मुनिश्री प.पू. 108 पुलकसागर महाराज यांचा चार्तुमास पुण्यातील धर्मानुरागी रसिकलाल एम. धारिवाल नगरी महालक्ष्मी लॉन्स येथे चालू आहे. सकल जैन वर्षायोग समितीतर्फे येथे चातुर्मासानिमित्त आयोजित ज्ञानगंगा महोत्सवात मुनिश्रींच्या प्रवचनाचा कार्यक्रम होतो. मात्र आज मुनिश्री तरूणसागर महाराज यांचे निधन झाल्याने महोत्सवातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. यावेळी उपस्थित भाविकांसमोर महाराज बोलत होते. याप्रसंगी समितीच्या अध्यक्षा शोभा धारिवाल, कार्याध्यक्ष मिलिंद फडे, उपाध्यक्ष अरविंद जैन, चकोर गांधी, अजित पाटील, सुजाता शहा, उत्कर्ष गांधी, सुदीन खोत, संजय नाईक आदी मंचावर उपस्थित होते. मंचावर मुनिश्री तरूणसागर महाराज यांचे मोठे तैलचित्र लावण्यात आले होते. त्यास सर्व मान्यवर व उपस्थित हजारो भाविकांनी फुले वाहून श्रद्धांजली अर्पण केली.

                शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अ‍ॅड.अभय छाजेड, पुणे मर्चंट चेंबरचे माजी अध्यक्ष राजेश शहा यांनी देखील उपस्थित राहून मुनिश्री तरूणसागरांच्या तैलचित्रास पुष्पांजली अर्पण केली.

                मुनिश्री पुढे म्हणाले, तरूणसागर महाराज हे एक क्रांतीकारी संत होते. भगवान महावीरांच्या विचारांना मंदिरातून बाहेर काढून जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य तरूणसागर महाराजांनी केले आहे. जैन धर्माच्या विचारांना त्यांऩी अतिशय सोप्या शब्दांत जनमाणसांपर्यंत पोहचविले. धर्माच्या अंतर्मनाला त्यांनी शब्दांचे कोंदण दिले. वाणीतील चहक आणि विचारांतील महक या दोन्हींचे संगम म्हणजे तरूणसागर महाराजांचे व्यक्तीमत्व होते. अशा तेजस्वी, दिव्य अनंताचा प्रवास सुखी होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना असे ते सद्गदित होऊन म्हणाले.

                यानंतर श्रद्धांजली सभा झाली. 

                याप्रसंगी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी मुनिश्री पुलकसागर महाराजांना श्रीफळ अर्पण केले. मुनिश्रींनी त्यांना पुस्तके भेट दिली. बाबासाहेब पुरंदरे यांनी मुनिश्री तरूणसागर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी ते म्हणाले की, माझे वय 97 वर्ष झाले असून, जो पर्यंत मी जिवंत आहे तो पर्यंत माझी सर्व शक्ती समाजाच्या भल्यासाठी खर्ची करण्याची बुद्धी मला लाभो अशी प्रार्थना मी करतो. पाप आणि चूक यामध्ये फरक असतो. माझ्या हातून कोणतेही पाप होऊ नये. आणि उर्वरित जीवन समाजाच्या हितासाठी कामी यावे, यासाठी मला आशीर्वाद द्या. मुनिश्री तरूणसागर महाराज यांचे जीवन व विचार सदैव प्रेरणा देत राहतील. आपण प्रत्येकानेच त्यांचे विचार अंगीकारले पाहिजेत असे ते म्हणाले.

                याप्रसंगी समितीच्या अध्यक्षा शोभा धारिवाल म्हणाल्या, मुनिश्री तरूणसागर महाराजांच्या पुण्यातील प्रवचनांच्या महोत्सव वेळच्या आठवणी आजही मनात घर करून आहेत. त्यांच्या दर्शनाने परमेश्वर भेटीची अनुभूती होत असे. संपूर्ण धारिवाल कुटुंबियांसोबतच त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते. पूर्ण विश्वात त्यांनी आपल्या विचारांनी राज्य केले असे त्या म्हणाल्या.     

                यावेळी समितीचे कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी तरूणसागर महाराजांच्या पुण्यातील सन 2005 मधील प्रवचनांच्या महोत्सवातील आठवणींना उजाळा दिला. मिलिंद फडे म्हणाले, ’समितीतर्फे पुण्यात 2005 साली मुनिश्री तरूणसागरांच्या कडव्या प्रवचनांचा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. 7 जानेवारी2005 ते 17 जानेवारी 2005 दरम्यान पुण्यातील ल.ग. शिंदे हायस्कूल येथे तरूणसागर महाराजांचा हा संस्कार महोत्सव घेण्यात आला होता. हा महोत्सव इतका अद्भूत होता की हजारोंच्या संख्येने भाविक दररोज उपस्थित राहत असत. मुनिश्री तरूणसागर महाराज देखील स्वत: सर्व भाविकांची प्रत्यक्ष भेट घेत असत. जैन एकताचे प्रतीक असलेल्या जनसंत साधूच्या जाण्याने समाजाची मोठी क्षती झाली आहे, असे ते म्हणाले.     

                महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड म्हणाले, तरूण सागर महाराज हे नावाप्रमाणेच मनाने अतिशय तरूण होते. विविध सामाजिक विषयांवर त्यांनी प्रभावी मार्गदर्शन केले आहे. पुण्यातील प्रवचनाच्या महोत्सवावेळी वडिलांसोबत त्यांची घेतलेली भेट आजही स्मरणात आहे. त्यांच्या निधनाची वार्ता ऐकूनच अतिशय दुःख होत आहे.               

                पुणे मर्चंट चेंबरचे माजी अध्यक्ष राजेश शहा म्हणाले, ’एक असे संत ज्यांनी इफ वन कॅन डू, वी ऑल कॅन डू’ या उक्तीनुसार आयुष्याची वाटचाल केली, आणि सर्वांना देखील हीच बाब लक्षात ठेवून वाटचाल करण्याचा संदेश दिला होता. आपल्या क्रांतीकारी भाषणाद्वारे त्यांनी जनमाणसाच्या मनात महत्वपूर्ण स्थान निर्माण केले.

                समितीचे उपाध्यक्ष चकोर गांधी म्हणाले, तरूणसागर महाराज हे सर्वधर्मीय समाजाचे साधू होते. पुण्यात जेव्हा त्यांच्या प्रवचनांचा महोत्सव होता तेव्हा एक महिना त्यांच्या सानिध्यात राहण्याची संधी मला मिळाली होती. त्यांच्या विचारांनी आयुष्याला नवी दिशा मिळाली. केवळ ज्येष्ठच नव्हे, तर युवा पिढीला देखील त्यांचे विचार पटत होते. अशा महान संतांच्या जाण्याने आतोनात दुःख होत आहे.

                मुनिश्री तरूणसागर महाराज यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. उपाध्यक्ष अजित पाटील यांनी आभार मानले.

                रविवार दि. 2 सप्टेंबर रोजी ज्ञानगंगा महोत्सवातील मुनिश्रींच्या प्रवचनाचे अखेरचे पुष्प गुंफले जाईल. त्यानंतर लगेचच सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 यावेळेत जिनशासनाचे महास्तोत्र श्री उवस्सहग्गर स्तोत्र याचे सामुहिक पठन संपन्न होणार आहे. यासाठी पुरूषांसाठी सफेद व महिलांसाठी केसरी वस्त्र हा ड्रेसकोड असणार आहे. भाविकांनी यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष शोभा धारिवाल आणि कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी केले.







  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com