पंढरपूर लाईव्ह दि. 3 मार्च (प्रतिनिधी):-
अक्कलकोट तालुक्यातील हेळ्ळी गावामधील व्यंकट हनुमंत कोळी व त्यांचे मित्र शरणाप्पा सिद्दाप्पा न्हावी या तरुणांवर गावातीलच मुस्लिम समाजातील कांही जणांनी गंभीर मारहाण करत प्राणघातक हल्ला केला. या घटनेतील आरोपींवर तात्काळ कारवाई करुन फरार आरोपींना अटक करावी या मागणीसाठी कोळी महासंघाचे वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरुणभाऊ कोळी व कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलिस प्रमुख, सोलापूर (ग्रामीण) यांना निवेदन सादर केले. या घटनेची माहिती देणेसाठी सोलापूरमध्ये एका पत्रकार परिषदेचेही आयोजन केले गेले. यावेळी उपस्थित पत्रकार बंधूसमोर अरुणभाऊ कोळी यांनी आपली भुमीका मांडली.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, दि. 30 मार्च 2015 रोजी रात्री 7:30 ते 7:45 वाजणेच्या सुमारास अक्कलकोट तालुक्यातील हेळ्ळी गावामधील व्यंकट हनुमंत कोळी व त्यांचे मित्र शरणाप्पा सिद्दाप्पा न्हावी हे दोघे मोटारसायकलवरुन अक्कलकोट वरुन हेळ्ळी कडे आले असताना याच गावातील हेळ्ळी चे माजी सरपंच अश्पाक मुजावर, महेबुब मुजावर, जावेद मुजावर, रज्जाक मुजावर, मैनुद्दीन मुजावर व त्यांचा आणखी एक साथीदार मिळून सहाजणांनी व्यंकट कोळी यांच्या मोटारसायकलसमोर ट्रॅक्टर आडवा लावून अडवले आणि काठ्या, लोखंडी रॉडने जबर मारहाण करुन गंभीररित्या जखमी केले. या घटनेतील जखमी ईसम सिव्हील हॉस्पिटल सोलापूर येथे उपचार घेत आहेत. या घटनेच्या 15 दिवसापूर्वीही वरील सहाजणांनी वरील दोघांना मारहाण केली होती; मात्र गावातील कांही प्रतिष्ठीत लोकांनी मध्यस्थी करत समज देवून हा वाद जागीच मिटवला होता. परंतू यानंतर ‘‘आमच्या विरोधात स्टे आणण्यासाठी कोर्टात का गेला?’’ असा जाब विचारत व्यंकट कोळी व शरणाप्पा न्हावी यांच्यावर जिवे मारण्याच्या उद्देशाने वरील 6 जणांनी प्राणघातक हल्ला केला आहे. या घटनेतील आरोपी हे गावातच लपून बसलेले आहेत मात्र अद्याप त्यांना अटक झालेली नाही. याबद्दल कोळी महासंघाचे राज्य अध्यक्ष रमेश (दादा) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशानुसार या घटनेचा पाठपुरावा करत असल्याची माहिती अरुणभाऊ कोळी यांनी दिली आहे.
कोळी महासंघाच्या वतीने व समस्त महादेव कोळी समाजाच्या वतीने जिल्हा पोलिस प्रमुख, सोलापूर (ग्रामीण) यांना सादर केलेल्या निवेदनामध्ये वरील प्रमाणे सविस्तर घटना कथन केलेली असून, ‘‘आम्ही कोणत्याच जाती धर्माच्या विरोधात किंवा मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही, सामाजिक कार्य करित असताना सर्व जातीधर्माला बरोबर घेवून काम करणे हीच खरी सामाजिक बांधीलकी असल्याचे आम्ही मानतो व अशा कोणत्याही घटनेने सामाजिक सलोखा बिघडू नये याची दक्षता घेवूनच कार्य करणे आमच्या संघटनेचे धोरण आहे. परंतु समाजावर अथवा समाजातील तरुणांवर विनाकारण झालेला अन्याय हा अयोग्य असून याविरुध्द आवाज उठविणे ही सुध्दा सामाजिक बांधिलकीच आहे. अक्कलकोट तालुक्यातील हळ्ळी गावात घडलेल्या या घटनेतील फरार आरोपींना त्वरीत अटक करावी.’’ अशी विनंती या निवेदनाद्वारे केलेली आहे.
यावेळी कोळी महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरुणभाऊ कोळी, महर्षि वाल्मिक संघाचे संस्थापक भारत (दादा) करकमकर, कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष रामभाऊ कोळी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अॅड.रामेश्वरी माने, जि. उपाध्यक्ष रुक्मिणीताई आलुरे शहर अध्यक्ष सुरेश पॅटी, तालुकाध्यक्ष बसवराज कोळी, सतीश घंटे, दत्ता म्हातनाळी, निलेश माने, मल्लु जमादार आदींसह कोळी समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.