उद्योजकांनी राज्य सरकार व स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने जलसंवर्धनासाठी पुढाकार घ्यावा,
पंढरपूर लाईव्ह (प्रतिनिधी):
मुंबई, दि. ७ : राज्यात मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्र या भागात दुष्काळी स्थिती आहे. विदर्भ, मराठवाड्याला सातत्याने दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागत आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याकडे शक्ती आणि संसाधने आहेत. यासाठी उद्योजकांनी राज्य सरकार व स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने जलसंवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी आज इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या सहकार्याने ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी’ या एकदिवसीय परिषदेचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षा श्रीमती राज लक्ष्मी राव, संस्थापक मधुलिका गुप्ता, टाटा समुहाचे डॉ.मुकुंद राजन आदि मान्यवर उपस्थित होते. राज्यातील दुष्काळी स्थिती हटविण्यासाठी
उद्योजक, सरकार आणि स्वयंसेवी संस्थाचा सहभाग महत्वाचा ठरेल, असे सांगून राज्यपाल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीमुळे व अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीमुळे
दोन्ही देशातील राजकीय, सामाजिक संबंध दृढ होण्यास सहाय्य मिळाले आहे, तसेच लोकशाही मुल्यांच्या जपणूकीसह, प्रादेशिक आणि जागतिक समस्यांच्या निराकरणासाठी एकत्रित प्रयत्नांना वेग येण्यास मदत झालेली आहे. उभय देशांतील चाळीसपेक्षा अधिक प्रश्नांचा विचार करून ते सोडविण्यासाठी धोरणात्मक प्रयत्न होणार आहेत. ‘ मेक इन महाराष्ट्र ’ अभियानात अमेरिकन कंपन्यांनी सहभाग घेतला असून, भविष्यात या कंपन्यांचा सहभाग वाढणार आहे. उत्पादन क्षेत्रात भारत अधिक सक्षम होत असल्याची ही चाहूल आहे. 'कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी'ची धोरणात्मक आणि सकारात्मक अंमलबजावणी केल्यास औद्योगिक उत्पादनात निश्चितच वाढ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
0 0 0 0