राज्यात थंडीची लाट

औरंगाबाद : मराठवाडा व विदर्भात थंडीची लाट आली असून, लातूर जिल्ह्यातील औराद शहाजनी येथे शनिवारी हंगामातील नीचांकी ३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कडाक्याच्या थंडीमुळे गारठल्याने हरीदास गोरखनाथ वानखडे (४५) यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथे उघडकीस आली.
हिमालयात होत असलेली हिमवृष्टी, उत्तर भारतात घटलेले तापमान यामुळे महाराष्ट्रात थंड वारे वाहत आहेत. गोंदिया, नाशिक, पुणे, परभणी, मालेगाव, बीड, अकोला, नागपूर येथे ८ अंशाखाली तापमान गेले आहे.
मुंबईच्या किमान तापमानात काही अंशी वाढ होऊन ते ११ वरून १६.६ अंशावर पोहोचले आहे. असे असले तरी थंड वाऱ्यामुळे मुंबईतील गारठा कायम आहे.
कोकण, कोल्हापूर वगळता बहुतांश ठिकाणचे तापमान १२ ते १३ अंशाच्या आसपासच राहिले आहे. येत्या आठवड्यात राज्यातील हवामान कोरडे राहणार असून, सोमवारपर्यंत मराठवाडा, विदर्भात थंडीची लाट कायम राहणार असल्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
पिकाला पोषक
गहू व हरबरा पिकाला थंडी पोषक आहे, मात्र भाजीपाल्यावर थंडीचा परिणाम होऊ शकतो.
किमान तापमान
(अंश सेल्सिअस)
औराद शहाजनी (लातूर) : ३
नांदेड : ४.५ गोंदिया : ६.५
पुणे : ६.६ परभणी : ६.६
नाशिक ७.४ अकोला : ७.५
मालेगाव : ७.५ नागपूर : ७.७
जळगाव : ८ उस्मानाबाद : ८.५
वर्धा : ८.९ महाबळेश्वर : ९.६
चंद्रपूर : १०.२ अमरावती : १०.४
यवतमाळ : ११ सातारा : ११.२
वाशिम : ११.२ सोलापूर : १२.६
सांगली : १३ कोल्हापूर : १५.१