स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियान
कोकण विभागाची आज कार्यशाळा
मुंबई,
दि. 28 : स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यातही स्वच्छ महाराष्ट्र
अभियान राबविण्यात येत असून या अभियानांतर्गत कोकण विभागाच्या ‘संकल्प स्वच्छतेचा’ या कार्यक्रमानिमित्त आज दिनांक 29 मे रोजी एक दिवसाची कार्यशाळा सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी 10 वाजता नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित
पाटील यांच्या हस्ते होणार असून या कार्यशाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आणि स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड ॲम्बेसेडर अभिनेते अमीर खान यांची प्रमुख
उपस्थिती असणार आहे. तसेच कोकण विभागातील सर्व महानगरपालिकांचे महापौर,
आयुक्त व मुख्याधिकारी, नगराध्यक्ष तसेच विभागीय आयुक्त यांचाही सहभाग
असणार आहे.
या कार्यशाळेत नगरविकास विभागामार्फत स्वच्छ महाराष्ट्र अभियानाबाबत
सादरीकरण करण्यात येईल. रामभाऊ म्हाळगी प्रबोधीनीमार्फत घनकचरा
व्यवस्थापनाबाबत सादरीकरण, जनवाणी संस्थेतर्फे लोक सहभागातून घनकचरा
व्यवस्थापन तसेच घनकचरा व्यवस्थापनासाठी तांत्रिक पर्यायांबाबतही सादरीकरण
करण्यात येणार आहे, असे नगरविकास सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी
सांगितले.
000
वृ.वि.1095 6ज्येष्ठ, 1937 (दु. 4.00 वा.)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्री दुर्गादेवी मंदिरास भेट
रत्नागिरी, दि.28 : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गुहागर येथील श्री दुर्गादेवी मंदिरास भेट देवून श्री मातेचे दर्शन घेतले. कोकण आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी आपले सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
रत्नागिरी
जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांचे आज सकाळी गुहागर येथील
रत्नागिरी गॅस विद्युत प्रकल्प कंपनीच्या हेलिपॅडवर आगमन झाले. त्यानंतर त्यांनी गुहागर येथील श्री दुर्गादेवी मंदिरास भेट दिली. यावेळी देवस्थान तसेच ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी याच देवस्थानच्या ठिकाणी माझे व्याख्यान झाले होते. ‘महाराष्ट्र काल, आज आणि उद्या’या विषयावर ते व्याख्यान होते आणि आज देवीच्या कृपेने महाराष्ट्राच्या वर्तमान आणि भविष्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे. त्या व्याख्यानाच्या वेळी दिलेली44 आश्वासने मी पूर्ण केली असून उर्वरित आश्वासने येत्या 4 वर्षात पूर्ण केली जातील,हा माझा निर्धार आहे. अडीच वर्षाने पुन्हा एकदा आपण या ठिकाणी भेटू त्यावेळी किती कामे पूर्ण झाली याचा आढावा आपण घेऊ, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मळण येथील जलयुक्त शिवार अभियान प्रकल्पाला भेट
त्यानंतर
मुख्यमंत्र्यांनी मळण येथील जलयुक्त शिवार अभियान प्रकल्पास भेट दिली व
तेथील सिमेंट नाला बंधारा तसेच समतल चर खोदाईच्या कामाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, कोकण विभागाचे पोलिस महानिरिक्षक प्रशांत बुरडे, प्रांताधिकारी रविंद्र हजारे आदींसह वरिष्ठ अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000
वृ.वि.1096 6ज्येष्ठ, 1937 (दु. 4.00 वा.)
कोकणाला पर्यटन विकासाच्या माध्यमातून
आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून देणार
रत्नागिरी, दि.28 : कोकणचा सर्वसमावेश विकास करण्याची क्षमता केवळ पर्यटन उद्योगात असून येत्या 5 वर्षात कोकण पर्यटन विकासाचा आराखडा तयार करुन त्याची यशस्वी अंमलबजावणी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथे आज केली. पर्यटन विकास आराखड्याच्या अंमलबजावणीनंतर गोव्यापेक्षा अधिक पर्यटक कोकणात येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथील माता पद्मावती मंदिराचा जिर्णोद्धार आणि कलशारोहण आज मुख्यमंत्र्यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित विशेष समारंभात ते बोलत होते. यावेळी आमदार भास्कर जाधव, आमदार सदानंद चव्हाण,माजी आमदार डॉ.विनय नातू, माजी आमदार बाळ माने, माजी आमदार मधु चव्हाण,जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार,कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक प्रशांत बुरडे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.संजय शिंदे, वरिष्ठ पत्रकार डॉ.उदय निरगुडकर, देवस्थान कमिटीचे मार्गदर्शक कृष्णाजी चव्हाण आदींसह शासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, पर्यटन उद्योग हा कोकण विकासाचा ‘युएचपी’आहे. त्यामुळे कोकणच्या पर्यटन विकासाचा 5 वर्षाचा आराखडा तयार करुन जागतिक पर्यटनाच्या नकाशावर कोकणला स्वतंत्र स्थान मिळवून देण्याचा आपला निर्धार आहे.कोकणातील सिंधुदूर्ग येथील सीवल्ड प्रकल्प आम्ही मार्गी लावत आहोत. कोकणातील प्रत्येक गाव हे पर्यटनाचे केंद्र बनले पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे. पर्यटनासह कोकणच्या सर्वांगिण विकासाला राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि नैतिक अशा सर्व पातळीवर पाठबळ देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यानी यावेळी स्पष्ट केले.
कोकणातील
आंबा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली असून
त्याबाबतचा अंतिम निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत लवकरच घेण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाची मुंबई बाहेरील पहिली बैठक कोकणात होईल आणि त्याबैठकीत कोकणच्या सर्वांगिण विकासाचा आराखडा जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन
राज्यात आणि रत्नागिरी जिल्ह्यातही जलयुक्त शिवार अभियान उत्कृष्ट पध्दतीने सुरु असून राज्यातील सुमारे 6 हजार गावात 70 हजार कामे हाती घेण्यात आली आहेत. यातून राज्य टंचाईमुक्त करण्याच्यादृष्टीने आश्वासक पाऊल पडले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. रत्नागिरी जिल्हा टंचाईमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी.यांनी तयार केलेला आराखडा उत्तम असल्याचे प्रशस्तीपत्र देत मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक केले. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जलसंधारणाच्या कामासह कृषी उत्पादनात वाढ, कृषी उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देणे अशा बाबींवरही भर देण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
माता
पद्मावती मंदिराच्या जिर्णोद्धार आणि कलशारोहण समारंभानिमित्त आलेल्या
मुख्यमंत्र्यांनी मंदिराचे बांधकाम उत्कृष्ट झाले असल्याचे सांगितले. आंध्रप्रदेश,कर्नाटक, राजस्थान, महाराष्ट्र अशा विविध राज्यातील शिल्पकलेचा संगम या मंदिरात पहायला मिळतो असे मुख्यमंत्री म्हणाले. भारतातील मंदिरे ही कधीच कर्मकाण्डाची ठिकाणे नव्हती, तर ज्ञान, शिक्षण, संस्कार देण्याची केंद्रे होती. मंदिराचा उपयोग एकता आणि सामाजिक समरसता वाढविण्यासाठी केला गेला. हीच परंपरा स्वा.सावरकरांनी जपली.तिला पुढे नेण्याचे काम आपणाला करावयाचे आहे, असे सांगून मंदिरे ही समाजपरिवर्तनाची केंद्रे बनावीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी स्वा.सावरकरांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करुन त्यांना आदरांजली वाहिली.
आमदार भास्कर जाधव यांचेही यावेळी भाषण झाले. त्यांनी कोकणातील निसर्ग सौंदर्य, आदरातिथ्थ्याची परंपरा, स्वच्छतेची आवड आदी वैशिष्ट्यांचा उल्लेख करुन कोकणच्या पर्यटन विकासासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांना केले.
वरिष्ठ पत्रकार डॉ.उदय
निरगुडकर यांनी पर्यटन विकासाच्या माध्यमातून कोकणचा कॉलिफोर्निया व्हावा
आणि कोकणातून मुंबईत पैसे पाठविणारी मनिऑर्डर संस्कृती सुरु व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
माजी आमदार मधु चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. मंदिराच्या जिर्णोद्धार व कलशारोहणासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. भारतीय मंदिरे ही संस्कृती आणि परंपरा जपण्याची साधने असून ज्ञान मंदिराइतकीच देवाची मंदिरेही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी गुहागर येथील श्री दुर्गादेवी मंदिराला भेट दिली. मळण येथील जलयुक्त शिवार अभियानाची पाहणी केली.
000
वृ.वि.1097 6ज्येष्ठ, 1937 (दु. 4.00 वा.)
अहमदनगर-बीड- परळी नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाचा पंतप्रधानांकडून आढावा
प्रकल्पाच्या खर्चाचा प्रस्ताव राज्य मंत्रीमंडळासमोर ठेवणार
- मुख्य सचिवांनी पंतप्रधानांना दिली माहिती
मुंबई, दि.28 : राज्यातील अहमदनगर-बीड- परळी या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी भूसंपादनाचे काम बहुतांश पूर्ण झाले असून या प्रकल्पामध्ये राज्य शासनातर्फे50 टक्के आर्थिक सहभाग असेल. या बाबतचा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या पुढील बैठकीत मंजूरीसाठी ठेवण्यात येईल, अशी
माहिती मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना
व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत दिली. पंतप्रधानांनी
प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
पंतप्रधान कार्यालयातर्फे सुरु करण्यात आलेल्या Pro Active Governance And Timely Implimentation (प्रगती)
पोर्टलच्या माध्यमातून दर महिन्याच्या शेवटच्या बुधवारी पंतप्रधान नरेंद्र
मोदी देशभरातील मुख्य सचिवांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून
प्रत्येक राज्यात सूरु असलेल्या महत्वपूर्ण प्रकल्पाचा आढावा घेत असतात.
काल बुधवारी दुपारी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरसिंग मध्ये पंतप्रधानांनी
महाराष्ट्रातील अहमदनगर-बीड- परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग
प्रकल्पाच्या कामाचा आढावा मुख्य सचिवांकडून जाणून घेतला.
या प्रकल्पाबाबत माहिती देताना मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय म्हणाले की, हा
प्रकल्प या भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार
आहे. हा प्रकल्प पूर्ण व्हावा अशी लोकभावना असून विकासासाठी चालना
देणाऱ्या या प्रकल्पासाठी1650 पैकी 1250 हे क्टर जमिनीची संपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल. 261.5 कि.मी. अंतराच्या या प्रकल्पासाठी 2819कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यातील 50 टक्के
भार राज्य शासन उचलणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडे प्रकल्पाच्या अंतिम
किंमतीबाबत राज्य शासनाच्यावतीने पत्र व्यवहार सुरु होता. नुकतेच या
संदर्भात रेल्वे मंत्रालयाने प्रकल्पाची अंतिम किंमत कळविली आहे.
राज्याच्यावतीने देण्यात येणाऱ्या 50 टक्के हिश्याबाबतचा प्रस्ताव आगामी मंत्रीमंडळ बैठकीत सादर करण्यात येईल. या प्रकल्पातील अहमदनगर ते नारायणडोह या 12 कि.मी
अंतराचे ट्रॅक लिंकिंगचे काम पूर्ण झाले असून नारायणडोह ते परळी
दरम्यानच्या कामासाठी भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित भूसंपादनाचे
काम सुरू आहे. अहमदनगर यार्ड संदर्भातला अभियांत्रिकी आराखडा पूर्ण झाला
आहे. 31 मार्च 2015 अखेर राज्य शासनाने या प्रकल्पासाठी 208 कोटी रुपये वितरीत केले असून रेल्वे मंत्रालयाने देखील 274 कोटी रुपये वितरीत केले आहे.
मार्च
मध्ये झालेल्या व्हिडिओ कॉन्फरसिंगमध्ये नवी मुंबई विमानतळ आणि एप्रिल
मध्ये सोलापूर येथील एन.टी.पी.सी या प्रकल्पांबाबत पंतप्रधानांकडून आढावा
घेण्यात आला होता.
००००