चैत्री यात्रा-आढावा बैठक संपन्न
पंढरपूर लाईव्ह:-
पंढरपूर दि.20: चैत्री यात्रेच्या निमित्ताने पंढरपूरात येणा-या वारकरी, भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याची काळजी सर्वच खात्याच्या अधिका-यांनी घ्यावी व समन्वयाने काम करावे असे आवाहन पंढरपूर न.पा.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर गोरे यांनी केले.
चैत्री यात्रा दिनांक 24 मार्च ते 03 एप्रिल या कालावधीत संपन्न होत असून यात्रा नियोजनासाठी प्रांत कार्यालय येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी गटविकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे, शहर पोलिस निरिक्षक किशोर नावंदे, निवासी नायब तहसिलदार एम.पी.मोरे, यांच्यासह संबधीत खाते प्रमुख उपस्थित होते.
पंढरीत वारीच्या सोहळ्यासाठी वारकरी व भाविकांच्या संख्येत वरचेवर वाढ होत आहे. त्या दृष्टीने वारकरी व भक्तांच्या सोयीकरता सर्वच खात्याच्या अधिकार्यांनी प्रयत्न करावेत त्याचबरोबर आरोग्य विभागाने स्वच्छतेची काळजी घ्यावी व वेळोवेळी पाण्याचे नमुने तपासून भाविकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करावी तसेच अत्यावश्यक औषधाचा साठा उपलब्ध करुन ठेवावा व साथीचे आजार पसरणार नाहीत याची दक्षता घ्यावी. विशेषता स्वाईन फ्युच्या पार्श्वभूमीवर आर्रोग्य विभागने सतर्कता बाळगावी असे सांगुन श्री. गोरे पुढे म्हणाले की उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वाळवंट परिसरात स्टॉल, धार्मिक विधी, वाहने पार्कींग तसेच दुकाने थाटण्यास मनाई आहे त्यामुळे भाविकांनी नविन पुलानजिक असलेल्या 65 एकर परिसरातील जागेचा वापर करावा तसेच या यात्रेत भाविकांच्या सोई करिता पंढरपूर न.पा. ने 18002331923 हा टोल फ्री नंबर सुरु केला आहे. या सुविधेचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
चैत्री यात्रेनिमित्त भाविकांच्या सोईसाठी परिवहन विभागातर्फे सुमारे 150 एसटी वाहने सोडण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे एसटी विभागाच्या अधिकार्यांनी सांगीतले. या बैठकीसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश बोधले, म.जि.प्रा.चे श्री.सुर्यवंशी, सा.बां.विभागाचे श्री.गावडे, महावितरण चे श्री.बीट्रा, अन्न औषध प्रशासन विभागाचे श्री.शेटे, बी.एस.एन.एल.चे श्री.भोसले यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.