सोमनूर ... एक विलक्षण अनुभव...



दोन खळाळते प्रवाह वेगाने सरकत एका बिंदूला एकत्र येतात आणि आपसात विरुन एका नव्या प्रवाहाला जन्म देतात. हा प्रवाह मग अधिक वेगाने पुढे धावायला लागतो. असा प्रवाह आणि त्याचा धडकी भरायला लावणारा आवाज पाण्याची शक्ती काय असते याची अल्पशी जाणीव करुन द्यायला पुरेसा आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा जेथे संपते तेथे एका बाजूला नवनिर्मित तेलंगणा आणि दुसऱ्या बाजूला छत्तीसगडच्या डोंगररांगा आणि स्थळ अर्थातच गडचिरोली जिल्ह्याचं टोक असणारं सोमनूर आणि एकत्र येणाऱ्या या दोन नद्या अर्थातच इंद्रावती आणि गोदावरी या संगमानंतर इंद्रावती गोदावरीत अंतर्धान पावते आणि पुढे गोदावरीचा प्रवाह सागराच्या ओढीने धावायला लागतो याविषयी...

नाशिकला ब्रम्हगिरीच्या पर्वत रांगांमध्ये थेंबा-थेंबाने उगम पावणारी गोदावरी संपूर्ण राज्याचा प्रवास करत मार्गात अनेक नद्यांना आपल्या प्रवाहात सामील करुन घेत इथवर येते. इथं तिचं पात्र अतिशय विस्तीर्ण आणि प्रवाह देखील पट्टीच्या पोहणाऱ्यालाही धडकी भरवणारा असाच आहे.

बारमाही वाहणाऱ्या नद्यांनी संपन्न अशा या गडचिरोली जिल्ह्याचं भूषण म्हणता येतील. अशा अनेक संगमांचा हा जिल्हा राज्याच्या सीमा अधोरेखित करणाऱ्या या संगमाच्या काही किलोमीटर आधी विस्तीर्ण अशा वैनगंगा आणि गोदावरीचा संगम होतो. दुसऱ्या बाजूने येणारी इंद्रावती भामरागडजवळ आपल्या प्रवाहात पर्लकोटा आणि पामूलगौतम नदीला सामावून घेते तो त्रिवेणी संगम. ही सर्व ठिकाणं पर्यटकांना पर्वणी ठरणारी अशीच आहेत.

सोमनूर हे गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा या तालुका मुख्यालयापासून 50 किमी अंतरावर असणारं छोटं गाव आहे. इथं देखील जुने सोमनूर आणि नवीन सोमनूर अशा दोन गावांमधून आपण या संगमापर्यंत पोहोचतो. सिरोंचा तालुका मुख्यालयाचे गडचिरोलीपासून असणारे अंतर 211 किमी इतके आहे. रस्त्याने जाताना उंच- उंच अशी माडाची झाडं आसमंतात दिमाखाने मिरवताना दिसतात. हा भाग महाराष्ट्राचा सिमेवरचा भाग आहे. यामळे इथली कौलारु घरांची बसकी रचना आपणास लगतच्या तेलंगणा राज्यात असल्याचा भास करुन देतात. या भागात आंध्रशैलीची पूर्ण छाप असून अर्धी वस्ती तशीच आहे. आणि येथे सर्वाधिक बोलली जाणारी भाषा देखील तेलगूच आहे.

इथं भेटीचा योग अगदीच योगा-योगाने कार्तिक पौर्णिमेला आला. सर्व गावांमध्ये यादिवशी दिव्यांच्या दिवाळीची लगबग सुरु होती. हॅपी दिवाळी संदेशासह दारोदारी रंगलेल्या रांगोळ्या आणि तोरणांनी सजवलेली घरं वेधून घेत होती.

हा भाग नद्यांनी वेढलेला असल्याने येथील जीवनशैलीवर त्याचा चांगलाच प्रभाव पडलेला आपणास दिसतो. येथील अन्नपदार्थात मासे आणि झिंगे यांचा मुबलक वापर होतो. याठिकाणी गोदावरीच्या पात्रात सापडणारे झिंगे आकाराने खूप मोठे आहेत. त्याची मागणी केवळ याच भागात नाही तर इतरत्रही असते. रसिक खवैय्ये केवळ झिंग्यांची मेजवानी घेण्यासाठी इथं भेट देतात हे उल्लेखनीय म्हणावे लागेल. या भागात शेतीही आदर्श शेती या प्रकारात घ्यावी लागेल. सर्व ठिकाणी आपणास शेतांना बांबूचे कुंपण घातलेले आपणास दिसते. यामुळे जनावरांमुळे पिकांचे होणारे नुकसान रोखले जाते. पाण्याची उपलब्धता असल्याने केवळ एक हंगामी शेतीवर इथं थांबत नाहीत आणि एकाच पद्धतीचे पिकही येथे घेतले जात नाही. धानाच्या शेतालगत ज्वारी आणि कापूस यांची शेती आपणास दिसते.

धानाच्या जोडीला कापूस, ज्वारी, तंबाखू, मिरची, मका अशी मिश्र स्वरुपाची शेती आपणास दिसते. दाळवर्गीय पिकांमध्ये इथे तुरीची लागवडही मोठ्या प्रमाणात होते. याठिकाणी ठेक्याने शेती करणारे अनेक शेतकरी लगतच्या तेलंगणामधून येतात.

सोमनूरला येण्यासाठी मुंबईहून नागपूर आणि गडचिरोलीमार्गे येता येते. गडचिरोली हे नागपूरपासून 180 किमीटर अंतरावर आहे. गडचिरोलीपासून आलापल्लीमार्गे सिरोंचा हे 215 किमी अंतर आहे. सिरोंचाहून असरअलीमार्गे 50 किमी अंतरावरील सोमनूरपर्यंत आपणास पोहोचता येईल. या भागास अतिदुर्गम भागापैकी एक म्हणून ओळखले जाते. सायंकाळी 6 नंतर येथे जाण्यासाठी आणि येथून परतण्यासाठी एस.टी.बस उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर सिरोंचा येथे मुक्काम करणे श्रेयस्कर ठरते.

गडचिरेाली जिल्ह्यात असणाऱ्या सुंदर अशा ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणून सोमनूरची ओळख आहे. हा भाग आता पर्यटन नकाशावर आणण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. मात्र खऱ्या पर्यटकांना स्थळ आणि अंतर यांची चिंता नसते अशा सर्वांना सोमनूर सतत खुणावत राहते.
-प्रशांत अनंतराव दैठणकर,
जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली.
'महान्यूज'